मुंबई : ‘युतीला मिळणारे प्रत्येक मत हे थेट नरेंद्र मोदींना मिळणार असून, २०१९ची ही निवडणूक देशाचे भवितव्य ठरविणारी आहे. नरेंद्र मोदींच्या नैतृत्वाखाली युतीचे सरकार आले, तर विकासाचा वारू चौफेर उधळेल अन्यथा देश विघातक शक्तींच्या हातात जाण्याचा धोका आहे,’ असे मत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लीलाधर ढाके यांनी व्यक्त केले.
भारतीय जनता पक्ष-शिवसेना-रिपब्लिकन पक्ष (आरपीआय) युतीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात तसेच ईशान्य मुंबई जिल्हा लोकसभा मतदारसंघाच्या युतीच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी हे बोलत होते. घाटकोपर येथील भानुशाली वाडी येथे आयोजित कोटक यांच्या पहिल्याच युतीच्या सर्व पक्षांच्या प्रमुख पदाधिकार्यांच्या मेळाव्यात युतीचे सर्व आमदार, नगरसेवक, माजी नगरसेवक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक नंदकुमार वैती यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांंसह ‘भाजप’मध्ये प्रवेश केला.
ढाके पुढे म्हणाले, ‘‘सेना-भाजप’ची युती ही राजकारणाच्या पलीकडे जाऊन नैसर्गिक तत्त्वांवर आधारित आहे आणि राष्ट्रभक्तीच्या सूत्रात गोवली आहे. नरेंद्र मोदी व उद्धव ठाकरे यांच्यावर श्रद्धा ठेवणारा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा प्रत्येक कार्यकर्ता युतीचे उमेदवार मनोज कोटक यांना विजयी करण्यासाठी प्राणाची बाजी लावेल.’
‘ईशान्य मुंबई हा युतीचा बालेकिल्ला असून, या मतदारसंघाने या आधी प्रमोद महाजन, जयवंतीबेन मेहता, किरीट सोमैया या ‘भाजप’ नेत्यांना लोकसभेत पाठविले आहे,’ असे सांगताना गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी मनोज कोटक हे याच परंपरेचा एक भाग बनतील अशी आशा व्यक्त केली. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वांत मोठा सन्मान व वंचित, तसेच दलित समाजाला न्याय देण्याचे काम गेल्या पाच वर्षांत मोदी सरकारनेच केले असल्याने ‘आरपीआय’ सर्व शक्तिनिशी युतीच्या व मनोज कोटक यांच्या मागे उभी राहील,’ अशी निसंदीग्ध ग्वाही ‘आरपीआय’चे राष्ट्रीय महासचिव अविनाश महातेकर यांनी दिली.
मनोज कोटक हे सक्षम, मेहनती व अभ्यासू कार्यकर्ते असून, त्यांना जिंकून आणण्याची जबाबदारी माझ्यासकट सर्वांची असल्याच्या भावना खासदार किरीट सोमैया यांनी व्यक्त केल्या. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी संपूर्ण मतदारसंघात युतीसाठी सकारात्मक वातावरण असून, विरोधक आपले डिपॉझिट वाचवण्यासाठी लढत असल्याचे सांगितले.
कोटक म्हणाले, ‘मी एक पक्षाचा सामान्य कार्यकर्ता असून, कोणताही वारसा नसताना पक्षाने मला एवढी मोठी संधी दिली याबद्दल पक्षाचे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार हे फक्त ‘भाजप’मध्येच घडू शकते. याच पक्षात सामान्य कार्यकर्त्याला राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी मिळू शकते व संघटनेच्या शक्तीच्या जोरावर एक सामान्य कार्यकर्तादेखील खासदार बनू शकतो.’